म्हसळा शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणार - पालकमंत्री आदिती तटकरे
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या संकल्पनेतून मुंबई येथे सुरू झालेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून मंत्री आणि आमदार यांची थेट भेट होत असल्याने महाराष्ट्रातील जनतेची शहरातील व ग्रामीण भागातील अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. या निमित्ताने राज्य सरकारमधील मंत्री, कार्यकर्ते आणि जनता यांच्या मध्ये थेट संवाद साधला जात असल्याने रखडलेली कामे निकालात निघत आहेत.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या जनता दरबाराचे आयोजन प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी असते. दिनांक27 एप्रिल रोजी झालेल्या जनता दरबारात म्हसळा तालुका बौद्धजन समिती (मुंबई) संस्थेच्या वतीने बौद्ध समाजाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करण्यासाठी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांना निवेदन देऊन निधीची मागणी केली असता शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे पालकमंत्री तटकरे यांनी आश्वासन दिले. भवन उभारण्यासाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी समिती सदस्यांनी कामाला लागावे असेही सुचित केले आहे. म्हसळा शहरात भव्य दिव्य आंबेडकर भवन निर्माण होण्याचा मार्ग जवळजवळ सुकर झाला असल्याने बौद्धजन समितीचे पदाधिकारी यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना धन्यवाद दिले आहेत. या कामी पक्षाचे म्हसळा तालुका मुंबई अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष महेश शिर्के यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभले आहे.