• नागोठणे हे मी माझे माहेर घरच समजतो - आ. रवीशेठ पाटील
• नागोठण्यात न भूतो न भविष्य आशा विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
मी कधीच राजकारण केले नाही मात्र काही लोक मला राजकारण करण्यास भाग पडतात.विकास कामे करत असताना आजपर्यंत मी कधीच राजकारण केले नाही हे सर्वश्रुत आहे.नागोठणे शहराचे चित्र बदलण्यासाठी विविध भागात येथील विविध आळ्यांत जी जी विकास कामे करण्याची गरज आहे त्याठिकाणी ती सर्व विकास कामे करण्यासाठी मी कटीबध्द आहे;कारण नागोठणे हे मी माझे माहेर घरच समजतो असे गौरवोद्गार पेण सुधागड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवीशेठ पाटील यांनी नागोठणे येथे काढले. स्थानिक आमदार विकास निधी कार्यक्रमांतर्गत नागोठणे येथील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन सोहळा गुरुवार दि. २१ रोजी सायं.६ वाजता आमदार रवीशेठ पाटील यांच्या शुभहस्ते तसेच राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
आ. रवीशेठ पाटील पुढे म्हणाले की,मी आमदार तुमचा आहे, मी तुमचा माणूस असून मी कधीच स्वतःला आमदार समजत नाही.नागोठणे शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ज्या ठिकाणी जी जी विकास कामे करायला पाहिजेत ती करणे गरजेचे आहे.यासाठी माझे मित्र राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य दक्ष सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी या विकास कामांची यादी मला द्यावी, यासाठी लागणारा निधी माझ्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नागोठणेकरांना शुद्ध पाणी कधीच मिळायला हवे होते परंतु अद्यापही पुरवठा सुरळीत चालू झाला नाही ही मोठी शोकांतिका आहे. शहराचा शुद्ध पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे.नागोठणे गावातील शुद्ध पाण्याचा प्रश्न आमच्याच अधिपत्याखालीच सोडविला जाईल असे स्पष्ट केले. तसेच प्रत्येक गावातील पाण्याचा , रस्त्यांचा, गटाराचा व आरोग्याचा प्रश्न सुटले पाहिजेत. आपण सर्व एक आहोत त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे तरच आपल्या गावाचा विकास होईल. केंद्राच्या जलमिशन अंतर्गत हर घर हर या योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकार कडे १३४८ कोटी निधी रायगड जिल्ह्यासाठी दिला आहे. या योजनेतून नागोठणे सह जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना अर्धवट असतील त्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याच योजनेचा लाभ घेत नागोठणेकरांना लवकरच शुद्ध पाणी मिळावे यासाठी कटिबद्ध असून आताचे हा भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम हा नुसता ट्रेलर आहे पिक्चर आजून बाकी असल्याचे यावेळी आ. रवीशेठ पाटील यांनी सांगितले.
यावेळी नागोठणे येथील उर्दू शाळे मागील नाला बांधणे (५ लाख) व बॅंक ऑफ इंडिया समोरील रस्ता तयार करणे (३ लाख) तसेच आंगरआळी येथील क्रॉस ड्रेन (५ लाख) या तीन कामांचा लोकार्पण याचबरोबर डॉ. कुंटे दवाखाना ते शैलेंद्र देशपांडे घर पेव्हर ब्लॉक बसविणे (५ लाख),श्री दत्त मंदिर ते चांदणी फ्लोअर मिल पेव्हर ब्लॉक बसविणे (४ लाख), जोगेश्वरी नगर येथील नाळ्याला संरक्षण भिंत बांधणे( ५ लाख), स्व. बाळासाहेब ठाकरे नगर अंतर्गत रस्ता तयार करणे( ३ लाख), आझाद मोहल्ला रस्ता तयार करणे (५ लाख) तसेच खुमाचा नाका ते मशीद रस्ता तयार करणे (५ लाख) या सहा आशा एकूण ४० लाख रुपये किंमतीच्या विकास कामांचा भूमिपूजन आ. रवीशेठ पाटील व राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमास भाजपाचे मारुती देवरे, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर, भाजपाचे आनंद लाड, श्रेया कुंटे, विठोबा माळी,अर्पणा सुटे, ज्ञानेश्वर सांळुखे,धनंजय जगताप यांच्यासह भाजप आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या क्रार्यक्रमाच्या निमित्ताने शांतीनगर येथील बॅंक ऑफ इंडिया समोरील रस्त्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर येथील वसाहतील ग्रामस्थांनी आ. रवीशेठ पाटील, राजिप सदस्य किशोरभाई जैन आणि सरपंच डॉ. मिलिंद धात्रक याचे आभार मानले.
शुद्ध पाणी प्रश्न अडकला श्रेय वादात - किशोरशेठ जैन
नागोठणे रोल मॉडेल बनवायचे हे स्वप्न मनात बाळगून
त्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच नागोठणे गावातील शुद्ध पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न श्रेय वादात अडकून पडला आहे. गेल्या २० वर्षा पासुन प्रलंबित असलेला नागोठणे गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी रायगड पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी अधिकारी वर्गाची मिटिंग घेऊन त्यांना डिसेंबर पर्यंत शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचे आदेश दिले होते मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अजूनही शुद्ध पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात पुन्हा एकदा मिटिंग लावावीत आणि आम्हाला यावेळी बोलावून हा प्रश्न लवकरच मार्गी लावावा. तसेच नागोठण्यातील सर्व पक्षातील नेतेगणांनी नागोठणे गावाचा जिव्हाळ्याचा असलेला शुद्ध पाण्याचा प्रश्न श्रेय वाद बाजूला ठेवून एकत्र बसवून सोडवावा याचबरोबर नागोठणेकरांना लवकरात लवकर शुद्ध पाणी मिळावे यासाठी आ. रवीशेठ पाटील यांनी यासाठी प्रयत्न करावे अशी आशा शिवसेना नेते राजिप सदस्य किशोरभाई जैन यांनी यावेळी व्यक्त केली.