वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे इन्व्हर्टर ला मागणी वाढली
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात इन्व्हर्टर ला मागणी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तळा तालुक्यात एप्रिल महिन्यापासूनच भारनियमन सुरू झाले आहे.त्यामुळे भारनियमनात उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून इन्व्हर्टरचा वापर वाढला आहे.तळा शहरात सध्या दिवसभरात दोन तास तर मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ असे ८ तास भारनियमन असते.शहराच्या मानाने ग्रामीण भागात अधिक तास भारनियमन असते.तालुक्यात साधारणपणे दर दिवशी चार ते सहा तास बत्ती गुल असते.पूर्वी तालुक्यातील नागरिकांना इन्व्हर्टरची एवढी गरज भासत नव्हती.ग्रामीण भागात तर इन्व्हर्टर चा दूरदूर पर्यंत संबंध नव्हता.ग्रामीण भागातील लहानशा कौलारू घरांमध्ये केवल एखाद दुसरं बल्ब आणि असलाच तर एखादा पंखा.त्यातही वीज गेली तर कंदील,रॉकेल वर चालणारी बत्ती व मेणबत्ती यांचा वापर केला जायचा.शहरातही काही सुशिक्षित वर्ग सोडला तर बाकी इतर कोणाकडेही इन्व्हर्टर पहायला मिळत नसत.परंतु हल्लीच्या आधुनिक युगात शहरासह खेड्यापाड्यातही बहुतांश नागरिकांकडे इन्व्हर्टर चा वापर केला जातो.ग्रामीण भागातही नवनवीन झालेल्या आलिशान घरांमध्ये इन्व्हर्टर बसविलेला असतो.यांसह बाजारपेठ परिसरात असलेल्या मोठमोठ्या दुकानांमध्येही इन्व्हर्टर पहायला मिळते.
भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांकडून इन्व्हर्टरला मागणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या १२ हजारांपासून ५० हजारांपर्यंत इन्व्हर्टर विक्रीसाठी उपलब्ध असून बहुतांश नागरिक हे १५ ते २५ हजारांपर्यंत इन्व्हर्टर घ्यायला प्राधान्य देतात.
(विजय लिमकर, सदगुरू कृपा इन्व्हर्टर विक्रेते )