टिम रायगड वेध
हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं.
मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येत असली तरी याची तिथी मात्र निश्चीत नसते. मकर संक्रांती तिथी कधी १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येत असते. यंदाच्या वर्षीच्या मकर संक्रांतीवर काही विशेष योगायोग घडत आहेत. यावेळी सूर्य आणि शनि एकत्र मकर राशीत असतील. हे संयोजन अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी १९९३ मध्ये या योग घडला होता. त्यानंतर २९ वर्षांनी हा दुर्मिळ योग पुन्हा घडणार आहे.
हा सण तीन दिवसांचा साजरा करण्यात येतो. या तिन्ही दिवसांचे महत्त्व देखील वेगवेगळे आहेत. संक्रांतीच्या अगोदरचा दिवस हा भोगी म्हणून साजरा करण्यात येतो. हिवाळ्यात येणारा पहिला सण हा भोगी असतो. ऐन थंडीच्या दिवसात येणाऱ्या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांनी बनलेली भोगीची भाजी केली जाते. सोबतच बाजरीची तीळ घालून भाकरी केली जाते. असा चविष्ठ बेत या दिवशी केला जातो. १४ जानेवारी रोजी संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी संक्राती या देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी मान्यता आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. किंकरआसुर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत.