🛑आगामी सर्व सण कोणतेही गालबोट न लावता आनंदाने साजरे करा - शिवरामभाऊ शिंदे
🛑शासकीय नियमावलीत गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांचे आवाहन
रायगड वेध नागोठणे अनिल पवार
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुस-यांदा आपण गणेशोत्सव सण साजरा करीत आहोत. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळेच आगामी काळात येणारे गणेशोत्सव, साखरचौथ गणेशोत्सव व नवरात्र उत्सव हे आपले सर्व सण कोरोना विषयी शासनाने लावलेल्या निर्बंधांचे पालन करुन, कायद्याचे पालन करुन, कोणताही भांडणतंटे न करता शांतपणे साजरे करा असे आवाहन रायगड जिल्हा शांतता समितीचे सदस्य व पळस ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांनी केले. पळस ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गुरूवारी (दि.२) सकाळी संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस नागोठणे पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर, पळस ग्रामपंचायतीच्या सरपंच परिक्षा घासे-चंदने, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, ग्रा.पं. सदस्य किसन बोरकर, निष्ठा विचारे, पळसचे माजी सरपंच हिराजी शिंदे, महादेव डाकी, पोलिस पाटील बबन शिंदे, मारुती शिर्के, गणपत डाकी, रामचंद्र कदम, संतोष भालेकर, सचिन जोशी, नागोठणे पोलिस ठाण्यातील हे.काॅ. विनोद पाटील, हे.काॅ. दिनेश ढेणे आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करतांना शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. घरगुती गणपतीसाठी दोन फूट व सार्वजनिक गणपतीसाठी चार फूट उंचीच्या गणेश मुर्तींची परवानगी असल्याने त्याचे सर्वांनी पालन करावे. गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी आरतीसाठी घरोघरी न जाता आपापल्या घरी आरती करणे, आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करणे, कोरोना काळात उपयुक्त ठरणारे रक्तदान शिबिर व इतर सामाजिक उपक्रम राबवून पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा असेही पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी स्पष्ट केले.